लढाई विदर्भाच्या अस्मितेची...
भाग २
जी भाषा जगण्याशी निगडीत प्रश्नांना हात घालते आणि ते प्रश्न सोडवण्यास हातभार लावते तीच भाषा सामान्यांचा आवाज बुलंद करत असते. त्यामुळेच वेगळा विदर्भ या प्रश्नाकडे नुसत्या भाषेच्या चष्मातून पहाता येणारच नाही. त्याला रोजच्या जगण्याशी निगडीत असलेले विविध कंगोरे आहेत.
हा प्रश्न समजून घेत असताना पूर्णतः शेती आणि शेतीशी निगडीत रोजगाराच्या साधनांभोवती फिरणारे विदर्भाचे अर्थकारण आधी समजून घेणे आवश्यक आहे. पिढ्यान पिढ्यान शेतीचेच संस्कार इथल्या समाजमनावर झाले आहेत. पुण्या- मुंबईत बसून महिन्याकाठी ठराविक पगार उचलणा-या नोकरदार वर्गाला त्या संस्काराची किंमत काय कळणार...?
ईतरांच्या अन्नासाठी कर्ज काढून मातीला पैसा लावण्यासाठी जिगर लागते. हिंमत असेल तर परतफेडीची कसलीच शाश्वती नसताना केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतीत असा पैसा गुंतवून दाखवा... महिन्याला मिळणा-या पगारीला दोन दिवसही उशीर झाला तर ज्यांचे बजेट कोलमडते अशांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलू नये, त्यांना तो अधिकारही नाही.
निसर्गाशी नशीबाचा आणि पर्यायाने जगण्याचा सट्टा लावणा-या शेतक-याला दारूड्या, पळपूटा, आळशी म्हणणे सोपे आहे. कारण हात झटकायला ना पैसा लागतो ना जबाबदारीची जाणीव लागते...
कास्तकाराच्या घरात चुली ऐवजी सरण का पेटले हे पाहण्यासाठी ज्या व्यवस्थेला स्वारस्य नसेल, त्या यंत्रणेच्या मागे वैदर्भीयांनी अंधळेपणाने यावे, ही अपेक्षा बाळगणे म्हणजे, निव्वळ निर्लज्जपणाचे लक्षण ठरेल. शेतीची दुरावस्था होत असताना ४० एकराचा मालक ४ एकरावर का आला...?
एकत्र राहण्याचे सल्ले देण्याआधी याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.
राहीला प्रश्न भाषेच्या अस्मितेचा. विदर्भाची मातीशी आणि खेड्यांशी असलेली नाळ अद्याप तुटलेली नसल्याने भाषेच्या अस्मितेबाबत विदर्भ पुण्या- मुंबईपेक्षा कैक पटीने कट्टरही आहे आणि आग्रही देखील आहे. कारण इथली ७० टक्के जनता आजही खेड्या पाड्यांत रहाते. मराठी हीच त्याच्या जगण्याचे साधन आहे आणि मरणाचे कफनही आहे. भाषेची इतकी कट्टरता आहे का शहरातल्या मराठी माणसांत...?
मराठी माणसाचे खरेच कल्याण करायचे असेल तर विदर्भाच्या खेड्या - पाड्यांत राहणा-या कास्तकाराच्या घरात डोकावून पहा जरा काय दशा आहे त्याची....? नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गळफास घेणारा कास्तकार हा ना युपी वाला भैया आहे, ना बिहारी बनिया. व्यवस्थेपायी मरणाच्या दारात लोटला गेलेला माणूस हा मराठीच आहे ना....पण दुर्दैवाने आज त्याच्या ना जगण्याला अर्थ आहे ना मरणाला किंमत. मात्र खेड्यातील मराठी माणूस असा बेमौत मरत असताना त्याच्यावर बोलायची कोणालाही गरज वाटत नसेल तर त्या एकत्र नांदायला काडिचीही किंमत नाही...
त्यामुळेच मराठी माणूस हा निव्वळ राजकारणाचा उथळ विषय आहे. त्यात काहीही दम नाही. मुंबई- पुण्यातल्या मुठभर मराठी माणसांच्या रोजगारावर गदा आली की अख्ख्या मराठी माणसाच्या अस्तित्वावर गदा आल्यासारखी ओरड करणा-यांना विदर्भातल्या मराठी माणसाच्या सरणावरची ही राख दिसत नसेल, तर का म्हणून त्या विदर्भाने उर्वरीत महाराष्ट्राच्या दावणीला बांधले जायचे....?
वेगळे होण्याइतपत आलेल्या या परिस्थिती मागचा मराठी माणसाचा हा टाहो कोणालाच ऐकू येत नसेल, तर नाही पाहिजे ती पोकळ एकजूटता आणि नाही पाहिजे ते असे मतलबी एकत्र राहणे.
-------
(विदर्भातील नेत्यांचा करंटेपणा पूढच्या भागात पाहू...)
---------
आनंद कस्तुरे
दि- २७ जाने २०१०
९८५०२०९७३७
Wednesday, 27 January 2010
Thursday, 21 January 2010
आता आर या पार...
लढाई विदर्भाच्या अस्मितेची...
भाग १
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दावरून सध्या राज्यात राजकीय कोलाहल माजला आहे. त्यामुळे संयूक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारे तेवढे शहाणे आणि बाकी सारे नालायक हा तथाकथीत युक्तीवाद हा चोरांच्या ऊलट्या बोंबा, असाच प्रकार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या गोंडस नावाखाली साठ वर्ष ईथला मलिदा लाटायचा आणि वरतून वेगळे होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अशा बोंबा ठोकायच्या, यासारखा शुध्द ढोंगीपणा शोधुनही सापडणार नाही.
उठ सूठ कोणिही यावे आणि विदर्भाला शिव्या-शाप देऊन मोकळे व्हावे, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. असे केल्याने आपण मुंबई- पुण्याच्या डबक्यात शहाणे ठरतो, असा काहींचा समज झालेला असावा. कारण या खेरीज महाराष्ट्रातल्या ईतरही भागात माणूस आहे, हे त्यांना माहितच नाही. वेगळे राज्य मागून जसे काय विदर्भाने अक्षम्य अपराध केल्यासारखी परीस्थिती निर्माण करणे ही तमाम वैदर्भियांच्या प्रती आजवर पोसलेल्या द्बेषाचीच पावती आहे. नव्हे तर ती एक सज्जड पुरावाच आहे.
विदर्भ गोरा की काळा हे ज्यांनी आयुष्यात कधी पाहीले देखील नाही, त्यांनी या तथाकथीत संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या सुरात सूर मिसळून विदर्भाला एकसंघतेची भाषा शिकवू नये. वास्तविक या प्रश्नावरून सामान्य वैदर्भीय माणसाच्या मनातही कोलाहल माजला आहे. सातत्याने होणारा अन्याय, दुर्लक्ष, त्यामुळे वाढत जाणारा अनुशेष आणि परिणामी थांबलेला विकास, सोबतच दरवेळेला या मुद्द्यांवरून नेत्यांचा खोटारडेपणा यासर्व बाबींमुळे आता वैदर्भीयांची घुसमट होत आहे. मग तो सिंचनाचा अनुशेष, नक्षलवादाची धग असो की शेतीची दुरावस्था, त्यातून वाढणारी नापीकी, या असह्यतेतून झालेल्या आत्महत्या असोत. ती सोडविण्यात आलेल्या अपयशातच हा प्रश्न दडलेला आहे.
मराठी अस्मिता आणि मराठी भाषिकांचे राज्य हा कांगावा करीत शिवसेना आणि तिचेच अपत्य असलेल्या मनसेने महाराष्ट्राच्या कल्याणाचा ठेका मिळाल्याचा आव आणला आहे. वास्तविक मनसेची निर्मीती देखील अशाच घुसमटीतून झाली आहे, याचा विसर बहुधा राज ठाकरे यांना पडलेला असावा.
विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचे सांगून याच राज ठाकरे यांनी शिवसेनेशी नाळ तोडून स्वतंत्र संसार थाटला. वेगळे होणे हा पर्य़ाय नाही, हा राज ठाकरे यांचा युक्तीवाद त्यावेळी कुठ्ला चारा खायला गेला होता.
मराठी अस्मीता, मराठी माणूस, एकसंघतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करायची, त्यावरुन संपूर्ण राज्याला वेठीस धरायचे आणि दूसरीकडे आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवायची, हे न समजण्या ईतकी वैदर्भीय जनता दूधखूळी नाही. तशा गैरसमजातही त्यांनी राहू नये. भाषेच्या पांचट - पुचकट मुद्यावरून मतांची झोळी भरणारी मुंबई - पुण्यासारखी विदर्भाची जनता कमजोर नाही.
मुळात विदर्भाला तथाकथीत पुणेरी मराठी भाषेशी काहिही घेणे देणे नाही. तिचा लेहजा हा बोली भाषेसोबत हिंदी भाषेषी साधर्म्य सांगणारा आहे. तो बाज वैदर्भीयांच्या नसानसांत भिनला आहे. मराठी भाषेबाबत जितकी कट्टरता वैदर्भीयांमध्ये आहे, तितकी ती शोधूनही इतरत्र सापडणार नाही. राहिला प्रश्न अस्मितेचा त्याचा दाखला घेण्यासाठी वैदर्भीयांना कोण्या परक्याची गरज नाही. कारण इतरांच्या ताटाकडे पहात जगणे ही विदर्भाची संस्कृती नाही.
आनंद कस्तुरे
दि- २१ जाने २०१०
९८५०२०९७३७
भाग १
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दावरून सध्या राज्यात राजकीय कोलाहल माजला आहे. त्यामुळे संयूक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारे तेवढे शहाणे आणि बाकी सारे नालायक हा तथाकथीत युक्तीवाद हा चोरांच्या ऊलट्या बोंबा, असाच प्रकार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या गोंडस नावाखाली साठ वर्ष ईथला मलिदा लाटायचा आणि वरतून वेगळे होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अशा बोंबा ठोकायच्या, यासारखा शुध्द ढोंगीपणा शोधुनही सापडणार नाही.
उठ सूठ कोणिही यावे आणि विदर्भाला शिव्या-शाप देऊन मोकळे व्हावे, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. असे केल्याने आपण मुंबई- पुण्याच्या डबक्यात शहाणे ठरतो, असा काहींचा समज झालेला असावा. कारण या खेरीज महाराष्ट्रातल्या ईतरही भागात माणूस आहे, हे त्यांना माहितच नाही. वेगळे राज्य मागून जसे काय विदर्भाने अक्षम्य अपराध केल्यासारखी परीस्थिती निर्माण करणे ही तमाम वैदर्भियांच्या प्रती आजवर पोसलेल्या द्बेषाचीच पावती आहे. नव्हे तर ती एक सज्जड पुरावाच आहे.
विदर्भ गोरा की काळा हे ज्यांनी आयुष्यात कधी पाहीले देखील नाही, त्यांनी या तथाकथीत संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या सुरात सूर मिसळून विदर्भाला एकसंघतेची भाषा शिकवू नये. वास्तविक या प्रश्नावरून सामान्य वैदर्भीय माणसाच्या मनातही कोलाहल माजला आहे. सातत्याने होणारा अन्याय, दुर्लक्ष, त्यामुळे वाढत जाणारा अनुशेष आणि परिणामी थांबलेला विकास, सोबतच दरवेळेला या मुद्द्यांवरून नेत्यांचा खोटारडेपणा यासर्व बाबींमुळे आता वैदर्भीयांची घुसमट होत आहे. मग तो सिंचनाचा अनुशेष, नक्षलवादाची धग असो की शेतीची दुरावस्था, त्यातून वाढणारी नापीकी, या असह्यतेतून झालेल्या आत्महत्या असोत. ती सोडविण्यात आलेल्या अपयशातच हा प्रश्न दडलेला आहे.
मराठी अस्मिता आणि मराठी भाषिकांचे राज्य हा कांगावा करीत शिवसेना आणि तिचेच अपत्य असलेल्या मनसेने महाराष्ट्राच्या कल्याणाचा ठेका मिळाल्याचा आव आणला आहे. वास्तविक मनसेची निर्मीती देखील अशाच घुसमटीतून झाली आहे, याचा विसर बहुधा राज ठाकरे यांना पडलेला असावा.
विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचे सांगून याच राज ठाकरे यांनी शिवसेनेशी नाळ तोडून स्वतंत्र संसार थाटला. वेगळे होणे हा पर्य़ाय नाही, हा राज ठाकरे यांचा युक्तीवाद त्यावेळी कुठ्ला चारा खायला गेला होता.
मराठी अस्मीता, मराठी माणूस, एकसंघतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करायची, त्यावरुन संपूर्ण राज्याला वेठीस धरायचे आणि दूसरीकडे आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवायची, हे न समजण्या ईतकी वैदर्भीय जनता दूधखूळी नाही. तशा गैरसमजातही त्यांनी राहू नये. भाषेच्या पांचट - पुचकट मुद्यावरून मतांची झोळी भरणारी मुंबई - पुण्यासारखी विदर्भाची जनता कमजोर नाही.
मुळात विदर्भाला तथाकथीत पुणेरी मराठी भाषेशी काहिही घेणे देणे नाही. तिचा लेहजा हा बोली भाषेसोबत हिंदी भाषेषी साधर्म्य सांगणारा आहे. तो बाज वैदर्भीयांच्या नसानसांत भिनला आहे. मराठी भाषेबाबत जितकी कट्टरता वैदर्भीयांमध्ये आहे, तितकी ती शोधूनही इतरत्र सापडणार नाही. राहिला प्रश्न अस्मितेचा त्याचा दाखला घेण्यासाठी वैदर्भीयांना कोण्या परक्याची गरज नाही. कारण इतरांच्या ताटाकडे पहात जगणे ही विदर्भाची संस्कृती नाही.
आनंद कस्तुरे
दि- २१ जाने २०१०
९८५०२०९७३७
Subscribe to:
Comments (Atom)