Saturday, 10 October 2009

आणखी किती बळी हवेत...!


भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या काही किलोमिटरच्या अंतरावर नक्षल्यांनी गुरूवारी अमानूषतेचा कळस गाठत परत १८ पोलीसांचा बळी घेतला. क्रुरतेलाही एकवेळा शरम येइल ईतके भयावह कृत्य नक्षल्यांनी घडवले. ज्या कुजकामी यंत्रणेमूळे मरकेगावचे हत्याकांड घडले त्याच गाफिलतेतून पुन्हा हा नरसंहार घडला. अवघ्या ९ महिन्यांत नक्षल्यांनी ५१ पोलीसांना याच पध्द्तीने घेरून ठार मारले. त्यामुळे राजकारणाच्या सारिपाटात सामान्यांचे दुःख पायदळी तुडविणारी ही मुरदाड यंत्रणा आणखी किती बळी घेणार आहे, हा सवाल या निमीत्ताने परत एकदा उभा केला आहे. नक्षल्यांशी झूंज देत हे जवान छाताडावर गोळ्या झेलत असताना सत्तेचा मलीदा चाखण्यासाठी आसूसलेले नेते आणि पुढारी सभांमध्ये व्यस्त होते. खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक परराज्यातील नक्षली महाराष्ट्रात आल्याचे कबूल करतात. त्यानंतर अवघ्या २४ तासांत १८ पोलीस मारले जातात. आणि राज्याचे गृहमंत्री घडणार्‍या घटना घडतच असतात असे विधान करत असतील तर हा शुध्द निर्लज्जपणा आहे. ज्यांच्या खांद्यावर हे रोखण्याची जबाबदारी आहे, त्यांची अशी मानसिकता असेल तर नक्षल्यांच्या छायेत रोज मृत्यूला सामोरे जाणार्‍यांनी कोणाच्या भरवशावर जगायचे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावर हा नरसंहार सुरू होता नक्षल्यांशी निकराने झुंज देणारे पोलीस वायरलेस वरून वारंवार मदतीची याचना करत होते. तरी देखील आपल्याच सहकार्‍यांच्या मदतीला धावून जाण्याची संधी देखील या पोलीसांना मिळाली नाही, या वरून नक्षल्यांचा हा कट किती नियोजनबध्द होता हे स्पष्ट होते. सकाळी दहा पासून दुपारी साडेतीन पर्य़ंत मोजके पोलीस ३०० नक्षल्यांशी जीवाची बाजी लावत झुंज देत होते. या मधल्या वेळेत अधीकार्‍यांनी जर वेळेचे गांभीर्य ऒळखले असते आणि त्यांना तातडीने मदत पोहोचवली असती तर कदाचित हा नरसंहार टाळता आला असता. मरकेगावची घटना घडून गेल्यानंतर नक्षली भागातील पोलीसांच्या मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्येक वेळी झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने हीच टेप वाजवलेली आहे. यावेळी पोलीस मरणाच्या दाढेत असताना हे हेलिकॉप्टर कोणाच्या तैनातीत होते, याचे उत्तरही कोणाकडेच नाही.
या भागात ३००हून अधीक नक्षली दाखल झाल्याची माहिती पाच दिवसांपुर्वीच पोलीसांना मिळाली होती. त्याच्या पूर्वीपासूनच या नक्षल्यांच्या दानापाण्याची सोय झाली होती. हा नरसंहार घडण्याच्या काही तासांपूर्वीच एका नेत्याची याच भागात जाहीर सभा शांततेत पार पडली होती. सभेच्या ठिकाणी काही पोलीसांनी साध्या वेशातील नक्षल्यांना ऒळखले होते. असे असतानाही ही यंत्रणा का गाफील राहिली? याचे उत्तर कोण देणार आहे. ज्या अर्थी एवढ्या शस्त्रसाठ्यासह पोलिसांना टार्गेट करतात, पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्या छाताडावर बसून मृत्यूचे तांडव घडवतात. उद्या त्यांचे टार्गेट बदलले तर परिस्थिती हाता बाहेर जायला वेळ लागणार नाही. त्यामूळे या हैवानी नक्षल्यांना वेळीच आवर घातला नाही तर उद्या आत्मसंरक्षणासाठी सामान्य माणूसाला शस्रे हातात घेण्याची वेळ येईल.
नक्षल चळवळ संपविण्याची ईच्छाशक्ती केंद्र आणि राज्यशासना जवळ नाही, अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. नक्षली आणि राजकारण्यांत मिलीभगत आहे. त्यामुळे हा प्रश्न मिटत नाही, अशी लाजिरवाणी टिका होत आहे. राज्यकर्ते आणि राजकारणी नक्षल्यांची मदत घेतात, हा गौप्यस्फोट कारागृहात असलेल्या एका नक्षल नेत्यानेच केलेला आहे. या घोळात निरपराध पोलीस आणि आदिवासींचे मात्र हकनाक बळी जात आहेत. एकीकडे राज्यभर निवडणूकांची धावपळ सुरू असताना सर्वच पक्ष सत्तेच्या सारिपाटावर आपली मोहर उमटवण्यासाठी आकांडतांडव करीत आहेत. मात्र एकाही नेत्याकडे अथवा पक्षाकडे नक्षलवादाच्या बिमोडाचा फॉर्म्युला नाही. नक्षल प्रश्नावर बोलणारे मोठमोठ्या गोष्टी करतात, पण ते अस्तित्वात येणार? यासाठी आणखी किती पोलिसांना शहीद व्हावे लागणार, हा प्रश्न आहे. गेल्या वर्षभरात नक्षलहल्यात शहीद होणार्‍या पोलिसांसमोर अनेकदा यंत्रणेची मान शरमेने खाली गेलेली आहे.
नक्षल कारवायांबद्दल केंद्रीय गुप्तचर विभागाने, राज्याला वारंवार सतर्क केले होते. सारे काही माहित असूनही यंत्रणा अशीच गाफील राहिली तर पोलिसांच्या आणि सामान्य माणसांच्या मरणाला काडीमात्र किंमत राहणार नाही. ऎन निवडणुकांत नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात छोट्या मोठ्या चकमकी घडवून आणल्या आहेत. माऒवादी नेता कोबाड गांधी यांच्या अटकेनंतर नक्षल चळवळीला मोठा फटका बसला आहे. कोबाड गांधीच्या सुटकेसाठी नक्षल्यांनी मोठी ताकद लावली आहे. बिहारमधील खगडीया जिल्ह्यात माऒवाद्यांनी १६ निरपराध ग्रामस्थांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी अशाच घटनेची पूनरावृत्ती आसाममध्ये झाली. उत्तर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात बोडो नक्षल्यांनी १२ ग्रामस्थांची हत्या केली. कोबाड गांधीच्या सुटकेसाठी नक्षल्यांनी दिलेले हे तगडे आव्हान आहे. त्यांनी दिलेल्या धमक्या आणि त्यांचे असे सैतानी कृत्य यावर केवळ चर्चेने तोडगा निघणार नाही, तर त्याला कृतीची जोड हवी आहे. सोबतच नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या जवानांचे खचलेले मनोबल वाढवविण्याची गरज आहे. त्यासाठी या नक्षलग्रस्तभागात झिरपा पध्दतीला फाटा देवून विकासाची गंगा पोचवण्याचे धोरण राबविण्याची गरज आहे. आपल्याच देशाच्या गर्भात पोसल्या गेलेल्या नक्षलवादाच्या विरोधात खर्‍या अर्थाने युद्ध छेडण्याचे गरज आहे. केंद्र सरकार आम्ही नक्षल्यांच्या विरोधात मोहिम उघडणार असल्याचे वारंवार सांगत आहे. अशा वल्गनाही अनेकदा करून झाल्या आहेत. मात्र मध्येच या घोषणा कोठे गायब होतात हे कोणालाच कळत नाही. आपली यंत्रणा, राज्यकर्ते आणि अधिकारीही गुप्त माहिती मिळाल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याएवजी स्वतःच ईतके नक्षली या भागात घूसले आहेत, ही भूषणावह बाब असल्यासारखे सांगत फिरतात तर हे कूठपर्यंत सहन करणार?
- आनंद कस्तुरे...९८५०२०९७३७
दि.०९-१०-२००९